स्नेह समृद्धी मंडळाच्या प्रकल्प “समर्था” अंतर्गत गावागावांमद्धे मुलींच्या बैठका सुरु आहेत. मुलींनी त्यांच्या आयुष्यामद्धे सर्वच बाबतीत प्रगती करावी त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी योग्य ते मार्गदर्शन यामद्धे करण्यात येते. मुलीही आता या बैठकांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊ लागल्या आहेत. त्याच्या मनात याबद्दल गोडी निर्माण झाली आहे. संस्थेच्या आधारगटांच्या माध्यमातुन मुलींच्या आईंशी या विषयावर चर्चा होत असल्याने त्यांनाही युवतींच्या बैठका होणे अतिशय महत्वाचे वाटत आहे. त्या स्वतः आपल्या मुलींना याबाबत समजावून बैठकांना उपस्थित रहाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील जवळजवळ ६ गावांमद्धे (मानसकोंड, कनारकोन्ड, आंबवली, मराठवाडी, देवधामापूर, मठधामापुर) अतिशय योग्य आणि सुरळीत पद्धतीने युवतींच्या बैठका सुरु आहेत. खुप चांगला प्रतिसाद या गावांमधून मिळतो आहे.
संस्थेच्या कार्यक्षेत्रातील काही ठिकाणी अनेक कारणांनी बैठकांना उपस्थिती कमी असल्याचे निदर्शनास आले, त्या ठिकाणीही संस्थेच्या कार्यकर्त्या व समुपदेशक सौ. सुनीता माईन यांनी मुलींच्या समुह बांधणीसाठी कंबर कसली आहे. त्या ठिकाणी जाऊन त्या मुलींचे व पालकांचे समुपदेशन करतात. हा विषय किती महत्वाचा आहे याबद्दल चर्चा करतात व अतिशय सचोटीने मुलींचे गट तयार व्हावेत आणि त्यांच्या बैठका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना यामद्धे निश्चितच यश येईल अशी संस्थेला खात्री वाटते.

